पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील कंत्राटी सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले जाणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू असून, त्यामुळे दीडशेहून अधिक सुरक्षारक्षकांवर बेकारीची कुर्हाड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी 1,580 कंत्राटी सुरक्षारक्षक पुरविण्याची निविदा काढली होती. पूर्वी यासाठी दोन, तीन ठेकेदारांकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यात येत असत. मात्र, दोन वर्षांपूर्वी पालिकेने एकच निविदा काढून राजकीय नेत्याच्या एका कंपनीला हे काम देण्यात आले होते. या कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना कधीही वेळेवर वेतन देण्यात आले नाही, तसेच पीएफही भरण्यात आला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले.
त्यामुळे प्रशासनाने पुढील वर्षीसाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा ऑक्टोबरमध्ये काढल्या. सुरक्षा रक्षक पुरविणार्या या नवीन कंपन्यांनी जुन्या कर्मचार्यांमधील 45 वर्षांवरील कर्मचारी आणि पुरेसे शिक्षण नसलेले 300 हून अधिक कर्मचारी कमी केले. काढून टाकलेल्या कर्मचार्यांना कामावर परत घ्यावे, यासाठी काही पुढार्यांनी प्रशासनाकडे तगादा लावला.
त्यामुळे नवीन ठेकेदार कंपन्यांनी तशी तयारी दर्शविली. परंतु ही तयारी दर्शवितांना संबंधित कर्मचार्यांकडे महापालिकेकडे मागील पाच वर्षे काम करत असल्याचे कागदोपत्री पुरावे मागितले. यात 300 पैकी जेमतेम 150 जणच योग्य ते पुरावे देऊ शकले. मागील पाच वर्षांचे पुरावे दाखल करताना काही मंडळींनी वेतन जमा होणार्या बँकेच्या पासबुकमधील नाव व खाते क्रमांकाची नोंद असलेल्या पहिल्या पानाची झेरॉक्स व जुन्या कामगारांच्या पासबुकच्या प्रत्यक्षात बँक एन्ट्रीजच्या पानांच्या झेरॉक्स जोडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, काढून टाकलेल्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयामुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे 150 कंत्राटी सुरक्षकांना कमी करावे लागणार आहे. सुमारे 300 नवीन सुरक्षा रक्षक घेण्यात आले आहेत. यापैकी कोणत्या 150 रक्षकांना काढायचे, याचा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.