Sanjay Raut News: आपल्या देशात ज्याच्या हाती ईव्हीएम त्याची लोकशाही असे समिकरण झाले असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
याप्रसंगी राऊत म्हणाले की, विधानसभेच्या निकालावर चिंतन, मंथन करण्यापेक्षा पुढे जायला हवे. आम्ही वर्षानुवर्ष निवडणुका लढतोय. पण गेल्या 10 वर्षांपासून ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत तसे 70 वर्षात पाहिले नाही. असे असतानाही महाराष्ट्र आणि देशात आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान झाले. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांनाही ते आम्हाला मिळाले की नाही अशी भावना आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत आहे.
विधानसभेला महाराष्ट्रात सत्ता येईल अशा प्रकारचे वातावरण होते. तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता. महायुतीचे सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ तयार झाले नव्हते. त्यानंतर मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेपाटप जाहीर होत नाही. पाशवी बहुमत असतानाही तुम्हाला कोण अडवतेय? महायुतीकडे 225 आमदारांचे बहुमत आहे. यात 140 च्या आसपास भाजपचे आमदार असून तरीही खातेवाटप होत नाही. हे राज्य चालणार कसे? राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी खून, हत्या, दरेडो, बलात्कार होत आहेत आणि हे 14 कोटी जनतेचे आभार मानत फिरत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
मुंबई महानगरपालिका हा कळीचा मुद्दा असतो. येथे शिवसेना महत्त्वाचा फॅक्टर असून एवढ्या कठीण परिस्थितीतही आम्ही 10 जागा जिंकल्या, तर 4 जागा फार कमी मतांनी हरल्या. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवावी लागेल. अन्यथा मुंबई वेगळी होईल. असेही राऊत म्हणाले.