Rohit Pawar on Maharashtra. political situation
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा आहे. या दुःखद घटनेवर सर्वच राजकीय पक्षांतील नेते आपली मते मांडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चेचा धुरळा उडाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करणारी एक सूचक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!
अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावण्यात आलेला फ्लेक्स कर्जत नगरपंचायतीने काढून टाकला. यावरही रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले. ही बाब अत्यंत संतापजनक, मा. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, ही विनंती!
अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी आज सकाळी शरद पवार यांची बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानात जाऊन भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप उपलब्ध नाही. मात्र अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात ही भेट होती, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा विषय हा पवार कुटुंबातील होता. याबाबत शरद पवारांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसल्यानेच अजित पवार यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली नसेल, असा टोला लगावत ‘हिंदू संस्कृतीत निधनानंतर १३ दिवसांचा शोक पाळला जातो’ असे ते म्हणाले. राष्ट्रवादी हा पक्ष पवारांचा होता, प्रफुल्ल पटेल यांचा नाही. ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे भक्त आहेत. अमित शाह त्यांना जे आदेश देतील, तोच निर्णय पटेल घेतील. प्रफुल्ल पटेल यांना पवार कुटुंबाचे मुखिया केले आहे का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ४) माध्यमांशी बोलताना केला.