चाकण : रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे स्थलांतराचा पवित्रा घेतलेल्या 20 लघु उद्योजकांच्या आणि कामगारांच्या रोजगारांच्या संकटावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे.
उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी शुक्रवारी (दि.14 ऑगस्ट) रोहित पवार चाकणमध्ये आले होते. चाकण एमआयडीसी मधील कुरुळी येथील हॉटेल साई सागर मध्ये त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला.
दरम्यान, चाकण MIDC मधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर काही गंभीर आरोप माध्यमांसोबत बोलताना केले आहेत. चाकणमधील रस्त्यांच्या आणि सोयी सुविधांच्या दुरावस्थेबाबत ज्यांनी आवाज उठवला त्यांना उद्योग मंत्री आणि त्यांच्या कार्यालयातून धमक्या आणि दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चाकण एमआयडीसीमधील काही उद्योजक आम्हाला आज भेटणार होते. मात्र उद्योग मंत्र्यांच्या कार्यालयातून त्यांना फोन गेला. या विषयावर तुम्ही का बोलतायत, तुम्हाला अडचणी येऊ शकतात. अशा प्रकरचा दबाव त्यांच्यावर टाकल्याने अनेकांनी भेटण्यास नकार दिला असल्याचे आमदार रोहितपवार चाकण मध्ये म्हणाले. ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला, त्या लोकांना बऱ्याच लोकांचे फोन केले की, तुम्ही का बोलताय, तुम्हाला अडचणी येऊ शकतात, तुमच्या धंद्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. अनेकांना धमक्या सुद्धा दिल्या गेल्यात, अशी माहितीआहे. त्यामुळे त्यांच्यातले काही लोक आज म्हणतात की आता आम्ही भेटू शकत नाही, तर काही भेटत असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे.
दरम्यान, बाहेरच्या कंपन्या चाकण मध्ये आल्यानंतर जर कचरा बघणार असतील, खराब रस्ते बघणार असतील, ट्राफिक बघणार असतील तर इथे येण्यापेक्षा आपण दुसऱ्या राज्यांमध्ये कुठेतरी जावं, असे त्यांना वाटेल. चाकण मध्ये, वाहतूक कोंडी, अपघात , पायाभूत सुविधांची वानवा, पाणी, वीज अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने या अडचणी सोडवण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे, असेही रोहित पवार म्हणाले.