पुणे; पुढारी वृत्तसेवा : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला अडवून कोयत्याने वार करीत जबरी चोरी करणार्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना 1 जूनला पहाटे साडेचारच्या सुमारास कात्रज चौकात घडली होती. आरोपींकडून रक्कम, गुन्ह्यात वापरलेला कोयता, दुचाकी गाडी जप्त केली आहे.
राजू नागनाथ कांबळे ऊर्फ काळ्या (वय 20) आणि अथर्व रवींद्र आडसूळ (वय 20, दोघेही रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. एका विधिसंघर्षित मुलाला ताब्यात घेतले आहे. हे आरोपी परराज्यातील प्रवाशांना लुटत होते.
फिर्यादी तरुणाला टोळक्याने 1 जूनला पहाटे साडेचारच्या सुमारास कोयत्याने वार करून साडेचार हजारांची लूट केली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. त्या वेळी पोलिस अंमलदार अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना हल्लेखोरांची माहिती मिळाली. त्यानुसार राजू आणि अर्थव याला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, नीलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे आदींनी ही कारवाई केली.