राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: ओढ्या, नाल्यांचा प्रवाह रोखुन अनधिकृत इमारती झाल्याने राजगुरूनगर शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली जात आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कसरत करावी लागत असुन अशा कामांवर बांधकाम विभागाने तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राजगुरूनगरच्या वाडा रस्त्यावर असे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यात संगम क्लासिक, गणेश वैभव आणि पुढे सातकर स्थळ हद्दीतील करंडे वस्ती या मुख्य ठिकाणांचा समावेश आहे.
संगम क्लासिक जवळ उत्तरेकडून आलेल्या ओढ्याचे पाणी वाहुन जाण्यासाठी वाडा रस्त्यावर मोरी टाकण्यात आली होती. तिथे अनधिकृत बांधकाम झाल्याने प्रवाह थेट अडला. इतर कोणत्याही ठिकाणी हे पाणी वाहून जायला जागा नाही. परिणामी थोडा पाऊस पडला की येथे पाणी साठते. त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त होते. गणेश वैभव इमारत परिसरात देखील हीच अवस्था आहे. येथे तर आडव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.
करंडे वस्तीवर जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर पावसाचे पाणी वाहते आणि दक्षिण बाजुला असलेल्या अनेक घरांच्या समोर तलाव साठून राहते. पाण्याखाली रस्ता उखडून पडलेले खड्डे कळुन येत नाहीत. त्यामुळे येथुन वाहन नेणे अपघातग्रस्त बनले आहे. पाऊस सुरू असेपर्यंत गुडघाभर पाणी असल्याने येथुन लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांना ये-जा करता येत नाही. नागरिक, संस्था तसेच सातकरस्थळ ग्रामपंचायतीने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देऊनही उपयोग झाला नाही. असे, सातकरस्थळच्या सरपंच माजी सरपंच अजय चव्हाण यांनी सांगितले.
शिरूर-भीमाशंकर राष्ट्रीय मार्गावरील हा रस्ता आहे. मोठ्या रहदारी आणि वर्दळीचा रस्ता आहे. अनेकांनी अतिक्रमणे केली. मुख्य प्रवाह अडले. नगरपरिषद त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करते हे प्रमुख कारण आहे. सगळ्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहुन जाईल, सांडपाणी जाईल असे पुल बांधुन या भागात रस्त्यावर सिमेंट कॉक्रिट करणार आहे. पुढच्या पावसाळ्यापुर्वी सगळी कामे पूर्ण करण्यात येतील.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड-आळंदी