पुणे

पुणे : विजयस्तंभाकडे जाणार्‍या रस्त्यांची होणार दुरुस्ती : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार्‍या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
विधानभवन येथे गुरुवारी कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता, त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात. पुणे-नगर रोड, तसेच इतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सोहळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

…असे असेल नियोजन
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, की कोरेगाव भीमा येथील अभिवादन कार्यक्रमासाठी यंदा मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नोव्हेंबरपासूनच तयारी सुरू केली आहे. या वर्षी जास्त नागरिक येणार असल्याचे गृहित धरूनच 17 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. पीएमपीकडून शहराच्या विविध भागांतून 390 बसगाड्या या ठिकाणी सेवा देणार आहेत. गेल्या वर्षी 260 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

पिण्याच्या पाण्यासाठी 130 टँकर आणि पुनर्वापर करता न येणारे दोन लाख ग्लास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबरोबरच 150 आरोग्यसेवक आणि कर्मचार्‍यांसह 15 रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच, पुणे जिल्ह्याबाहेरून येणार्‍या नागरिकांसाठी महामार्गांवर मोठे फलक लावण्यात येणार आहेत. कोरेगाव भीमा येथे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT