वाडा : पुढारी वृत्तसेवा : डिंभे धरणातील पाणी अहमदनगरमधील इतर तालुक्यांना देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. ते पाणी आंबेगाव तालुक्याच्या पठार भागाला द्या; मात्र माझा तालुका पाण्यापासून वंचित ठेवू नका. वेळप्रसंगी राजकारणाचा त्याग करण्याची वेळ आली तरी मी करेन. माझ्या तालुक्यातील जनतेच्या हितासाठी रक्त सांडायची वेळ आली तरी मी करेन, कसल्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे पाणी आम्ही आंबेगावला जाऊच देणार नाही, अशी परखड भूमिका आ. दिलीप मोहिते पाटील यांनी मांडली. कळमोडी (ता. खेड) येथील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आ. मोहिते पाटील यांच्या हस्ते धरणातील जलसाठ्याचे पूजन मंगळवारी (दि. 1) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आ. मोहिते पाटील म्हणाले, कळमोडी धरणातील पाणी आंबेगाव तालुक्याला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वीही आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. कळमोडी धरणाचे पाणी आमच्या हक्काचे असून, एक इंचही पुनर्वसन आंबेगाव तालुक्याला झालेले नाही. त्यामुळे या पाण्यासाठी आम्हाला कालही संघर्ष करावा लागला, आजही आहे तर उद्याही करावा लागणार आहे.
या वेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी सभापती सुरेश शिंदे, लीगल सेलचे अॅड. अरुण मुळुक, लक्ष्मण मुके, बाळासाहेब गोपाळे, तालुका राष्ट्रवादीचे नामदेव गोपाळे, महिला राष्ट्रवादीच्या सुजाता पचपिंड, मंगलदास पवार, कळमोडीच्या सरपंच हेमलता गोपाळे, उपसरपंच दिगंबर गोपाळे, संजय गोपाळे, विठ्ठल गटे, सुदाम पवार, उपविभागीय अभियंता डी. एस. डिग्गीकर, सहायक अभियंता एस. एस. सुसुंद्रे आदींसह कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.