पुणे: नवरा पसंत नसल्याच्या कारणावरून पतीशी वैवाहिक संबंध प्रस्थापित न करत विवाहाच्या आठ महिन्यांनंतर माहेरी गेल्यानंतर सासरी न परतणार्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. फुलबांधे यांच्या न्यायालयाने नोटीस पाठविल्यानंतर पत्नी हजर न झाल्याने न्यायालयाने एकतर्फा आदेश काढत विवाह रद्द केला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे पतीला दिलासा मिळाला आहे.
वैभव आणि वैभवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह 17 डिसेंबर 2022 रोजी पारंपरिक पध्दतीने पाहणी करून झाला. नवरा पसंतीचा नसल्याने लग्नात वैभवीचा चेहरा उतरला होता. याबाबत वैभवने विचारल्यास आजारी असल्याचे तिने सांगितले. काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, अशी वैभवला अपेक्षा होती.
मात्र, तसे झाले नाही. पूजा झाल्यानंतर घर आवडले का, असे त्याने विचारले. त्या वेळी पतीच आवडला नाही, घरच्यांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने लग्न करावे लागल्याचे तिने सांगितले. तिने वैवाहिक संबंधास नकार दिला. ती सतत माहेरी जायची. 20 ऑगस्ट 2023 रोजी माहेरी गेली. मात्र, वैभव व कुटुंबीयांनी प्रयत्न करूनही ती परत आलीच नाही. त्यामुळे वैभवने अॅड. राहुल जाधव यांच्यामार्फत लग्न रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
विवाहाच्या एक वर्षाच्या आत विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. त्यानुसार हा अर्ज करण्यात आला होता. घटस्फोट घेतल्यानंतर घटस्फोटित असा शिक्का पडतो. मात्र, चूक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. तो मंजूर झाला. या निर्णयामुळे दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे आहेत.- अॅड. राहुल जाधव, कार्यकारिणी सदस्य, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन