राज्यात मान्सून सक्रिय झाला असून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्याला रविवारी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. कोकणला बुधवारपर्यंत 'ऑरेंज', तर उर्वरित राज्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
संपूर्ण देशात मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी मान्सून फार पुढे सरकला नाही. मात्र राज्यात वाऱ्याचा वेग वाढल्याने बुधवारपर्यंत कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीला रविवारी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. यात केरळ, तामिळनाडूपासून कोकण किनारपट्टीपर्यंत रेड अलर्ट तर गुजरात किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सातारा, पुणे, कोल्हापूरच्या घाटमाथ्याला २३ रोजी रेड अलर्ट, तर २६ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्यांना हवामान विभागाने कमालीची सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.