पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 75 हजार पदांच्या भरतीप्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. पुण्यामध्ये पदभरतीची प्रक्रिया हा संवेदनशील विषय असून, कोचिंग क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही काही क्लासेसचे 'अजेंडे' असतात. मात्र, यातून मार्ग काढून पदभरतीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेबाबत कार्यक्रमादरम्यान सरकारची भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले की,
गेल्या सरकारच्या काळात सरकारी पदभरतीच्या प्रक्रियेत पेपरफुटीसारखे गैरप्रकार झाले. पेपरफुटीसारखे प्रकार होत असल्यास, हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे या भरतीप्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असून, त्यासाठी टीसीएस, आयबीपीएससारख्या कंपन्या नेमण्यात आल्या आहेत. या कंपन्यांच्या विरोधात देशभरात एकही तक्रार नाही. येत्या काही काळात पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.