पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : बेट (ता. शिरूर) भागात रात्रीच्या थंडीबरोबरच दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कडक तापमानामुळे सध्या गव्हाचे दाणे परिपक्क होऊन गहू काढणी अवस्थेत आल्याचे दिसत आहे. बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, काठापूर, वडनेर, फाकटे, चांडोह आदी गावांमध्ये साधारण थंडीची चाहूल लागल्यावर गव्हाचे पीक घेतले जाते. थंडीचे वातावरण या पिकास पोषक राहिल्याने या हंगामातील गव्हाची वाढ चांगलीच जोमदार झालेली पाहायला मिळत आहे.
पूर्वी गरजेनुसार मजुरांची उपलब्धता पाहून गव्हाचे पीक घेतले जात असे. परंतु, आता हार्वेस्टर यंत्राद्वारे गव्हाची काढणी, मळणी काही तासांत होत असल्याने आणि त्यामुळे खर्च व वेळेत बचत होत असल्याने शेतकरी जास्त प्रमाणात गव्हाचे पीक घेतात. चालू हंगामात थंडीचे प्रमाण आणि पोषक वातावरण राहिल्याने गव्हाच्या पिकास फायदा होणार आहे. उत्पादन समाधानकारक मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.