खडकवासला: ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्य लाभलेल्या राजगड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. किल्ले राजगडला युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनाची जोड मिळाल्याने या भागाचे महत्त्व जागतिक पातळीवर पोहचले आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी आणि सुट्यांच्या दिवशी पानशेत, वरसगाव आणि गुंजवणी धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे.
राजगड तालुका हा पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. पुणे-मुंबई तसेच परराज्यांतील पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात शांत क्षण अनुभवण्यासाठी या भागाला पसंती देत आहेत. पानशेत आणि वरसगाव धरणांचे विस्तीर्ण जलाशय, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आल्हाददायक वातावरणामुळे अनेक पर्यटक येथे मुक्कामालाही प्राधान्य देत आहेत.
धरण परिसरातील वाढत्या पर्यटनामुळे रिसॉट्र्स, कृषी पर्यटन केंद्रे, बांबू कॉटेजेस, माचन आणि ट्री हाऊस अशा विविध निवास सुविधा उभ्या राहिल्या आहेत. शनिवार-रविवारी बहुतांश रिसॉट्र्स आणि हॉटेल्स ‘फुल्ल’ होत असून, पर्यटकांकडून आगाऊ बुकिंगला मोठी पसंती मिळत आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रिसॉर्टचालकांकडून वॉटर स्पोर्ट्स, निसर्ग भमंती, ग््राामीण खाद्यसंस्कृती आणि कॅम्पिंगसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ‘वीकेंडला रिसॉर्ट्स पूर्णपणे बुक असतात. पर्यटकांना अस्सल गावरान आणि चुलीवरच्या जेवणासोबत सुरक्षित ट्रेकिंगचा अनुभव देत आहोत. पर्यटनामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे,’ अशी माहिती हॉटेल व्यावसायिक पराग देशपांडे यांनी दिली.
पर्यटन क्षेत्राच्या विस्तारामुळे राजगड तालुक्यातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायात स्थानिकांना प्राधान्य दिले जात असल्याने ग््राामीण अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. तसेच ‘होम स्टे’ आणि गावरान जेवणावळीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना हक्काचा व्यवसाय उपलब्ध झाला असून, पर्यटकांमुळे स्थानिक व्यवसायाला मोठा हातभार लागत असल्याचे चित्र आहे.