सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या पश्चिम भागाला गुरुवारी (दि. 6) सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी सहापासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळीच बंद झाला. तब्बल दहा तास संततधार पाऊस झाल्याने सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे शेतीपिकात पाणी साठले आहे. नवरात्र उत्सवातही सोमेश्वरनगर परिसराला पावसाने झोडपून काढले होते. पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
परिसरातील सर्वच ओढे, नाले, विहिरी, तलाव पुन्हा भरून वाहू लागले आहेत. सलग पाऊस होत असल्याने सोयाबीनची काढणी रखडली आहे. निरा खोर्यात झालेल्या पावसामुळे वीर धरणातून निरा नदीत 900 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. निरा डावा कालवा देखील भरून वाहत आहे. गुरुवारी सोमेश्वर परिसरात 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनमध्ये सोमेश्वर भागात पावसाने ओढ दिली होती.
मात्र, यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत या भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. उसाच्या सरीत पावसामुळे पाणी साठले असून, शेतकरी ते पाणी पाटाद्वारे बाहेर काढत आहेत. सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम तोंडावर असून, पाऊस असाच राहिला तर हंगाम सुरू होण्यास वेळ लागणार आहे. सोमेश्वर कारखाना परिसरासह मुरुम, वाघळवाडी, वाणेवाडी, निंबुत, करंजेपुल, करंजे, सोरटेवाडी, होळ, सोमेश्वर मंदिर परिसराला पावसाने झोडपून काढले.