वेल्हे : तब्बल दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यासह पानशेत वरसगाव धरण खोर्यात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात खडकवासला धरण साखळीत 0.28 टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरण साखळीत शनिवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता 25.87 टीएमसी म्हणजे 88.75 टक्के साठा झाला होता. (Latest pune News)
धरण साखळीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजता 25.59 टीएमसी पाणी होते. दरम्यान, या चारही धरणक्षेत्रात अधूनमधून रिमझिम सुरू होती. यानंतर सायंकाळी ठिकठिकाणी एक-दोन सरी कोसळल्या. शनिवारी सकाळपासूनच पानशेत वरसगावसह चारही धरण क्षेत्रात रिमझिम सुरू आहे. खडकवासला परिसरात हलका पाऊस पडत असला तरी पानशेत-वरसगाव खोर्यात चांगला पाऊस झाला. दरम्यान, गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाअभावी धरणसाठ्यात घट सुरू होती. आता या पावसामुळे धरणसाखळीतील पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे. शनिवारी दिवसभरात पानशेत येथे 19, वरसगाव येथे 17, टेमघर येथे 18 व खडकवासला येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील तव, दापसरे टेकपोळे, शिरकोली, ठाणगाव, घोडशेत, पोळे आदी ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे. नद्या,ओढे नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत. त्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरणाची पाणी पातळी 90 टक्क्यांहून अधिक झाली आहे. या दोन्ही धरणातून खडकवासला धरणात प्रत्येकी 600 क्सुसेक्स पाणी सोडले जात आहे. टेमघरची पातळीही 95 टक्क्यावर पोहचली आहे.
सध्या धरणसाखळी परिसरात जोरदार पाऊस पडत नसला, तरी रिमझिम सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात हळूहळू भर पडत आहे. अद्यापही धरण क्षेत्रात पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची तूट भरून धरणसाखळीत शंभर टक्के साठा होण्याची शक्यता आहे.- गिरिजा कल्याणकर -फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण