मुंढवा; पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील अनंत टॉकीज परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मागील वीस वर्षांपासून निवडणुकांमध्ये मते मागण्यासाठी नागरिकांना या पुलाच्या कामाचे गाजर दाखविण्यात आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या पुलाचे काम सुरू झाले. मात्र, ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मागील साडेतीन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने मोठ्या थाटामाटात या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केले. त्या वेळी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, साडेतीन वर्षे पूर्ण झाली असली, तरी हे काम अजून अर्धवट आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
या उड्डाणपुलाच्या कामामुळे रेल्वेगेटवर होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शालेय मुलांची वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडत आहेत. यामुळे रुग्णवाहिका दवाखान्यात वेळेत पोहचत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुसर्या उड्डाणपुलाचे नियोजनच नाही
परिसरातील दुसरे रेल्वेगेट असलेल्या साईबाबा मंदिर परिसरात सध्या वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणतेही नियोजन केले नाही. यामुळे नागरिकांना अद्यापही या पुलाची प्रतीक्षाच आहे.