राजेंद्र खोमणे
नानगाव: दौंड तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. ज्या गावात जे आरक्षण निघाले आहे अशांनी आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे दिसते. सरपंच आरक्षण जाहीर झाले. आता लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. मात्र, याबाबी होतील तेव्हा होतील पण इच्छुक सरपंचांनी कामाला आत्तापासूनच सुरुवात केली आहे.
गावागावांत वेगवेगळे राजकीय पक्ष, गट- तट आहेत. अशा गटा- तटामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. आपल्या गटातून एकमताने एकच उमेदवार देऊन निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला धोबीपछाड देत गावात सत्ता स्थापन करायची अशी एका बाजूला चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे गटातून एक उमेदवार निश्चित करणे हे एवढे सोपे नसते. सरपंचपदासाठी गटातून अनेक जण इच्छुक असतात, त्यामुळे तडजोड करता करता गावनेत्यांच्या नाकीनऊ येतात.
सध्याच्या राजकारणात जुने व नवे असे नेत्यांचे गट असल्याची चर्चा गावागावांत सुरू आहे. आता ज्येष्ठांनी थोडं थांबून तरुणांना गावचा कारभार चालविण्यासाठी संधी द्यावी अशी चर्चा गावागावांतील कट्यावर होताना दिसून येत आहे.
निवडणूकीच बिगूल वाजलं की ज्येष्ठ काय आणि तरुण काय सगळ्यांच्या अंगात निवडणुकीच वारं यायला सुरुवात होते आणि सुरू होतात राजकीय डावपेच आणि मोर्चेबांधणी, गटात आपण इतरांपेक्षा कसे सरस आहोत हे दाखवण्यासाठी इच्छुक आपल्याकडे किती गावनेते आणि कार्यकर्ते आहेत यासाठी प्रयत्न करताना सर्रास दिसून येतात आणि मग सुरू होते गटागटातील धुसफूस.
पतीराजही मैदानात
तालुक्यातील ज्या गावांमध्ये सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आरक्षण आहे अशा ठिकाणी इच्छुक महिला उमेदवारांच्या पतीराजांनी देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
गावात हलचल वाढली
तालुक्यातील बर्याच गावांतील नागरिक आपापल्या सोयीनुसार वाडीवस्तीवर व शेतात राहण्यासाठी गेलेले आहेत. पूर्वी वाडीवस्त्यांवर जीवनावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध नसल्याने ही मंडळी गावात येत असत, त्यामुळे गावात सतत वर्दळ होती. मात्र, सध्या वाडीवस्त्यांवरदेखील सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या असल्याने नागरिक गावात येत नाहीत. मात्र, आता निवडणुका जवळ आल्या असल्याने जे चेहरे कधी गावात दिसत नाहीत तेदेखील गावात हाय-बाय करताना दिसू लागले आहेत.