कामशेत : गेल्या चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कामशेत परिसरात भातशेतीनंतर शेतकर्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली आहे. नुकतीच थोडीफार थंडी पडू लागल्यामुळे रब्बी पिके उगवणी दमदार सुूरू होती. परंतु, सध्या थंडीचा जोर ओसरू लागला आहे. त्यातच ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची शक्यता आहे. परिणामी पिके धोक्यात आली आहेत. असेच वातावरण अजून काही काळ चालू राहिल्यास रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रब्बी पिकांचे उत्पन्न कमी होण्याची शक्तता वर्तविली जात आहे. तसेच, पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. नाणे मावळातील शेतकर्यांनी हरभरा, वाटाणा, मसूर, गहू, ज्वारी, वाल तसेच सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्यांनी तरकारी भाज्यांची लागवड केली आहे. खरेदी केलेली महाग बियाणे व तरकारी रोपे, पेरणीचा व मजुरांचा खर्च आणि केलेले कष्ट यामुळे शेतकरी मेटकुटीला आला आहे. गायब झालेली थंडी आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिके कशी वाचवायची, असा प्रश्न शेतकर्यांपुढे पडला आहे.