Purandar Water Scarcity Pudhari
पुणे

Purandar Water Scarcity: पुरंदरचा मोठा भाग अद्याप तहानलेला;वीर धरण तुडुंब मात्र दमदार पावसाचा पत्ताच नाही

अनेक गावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यांची टंचाई असल्याने येथे ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावच्या पश्चिम दिशेस १२ किलोमीटर अंतरावर असलेले वीर धरण मागील काही दिवसांपासून भरले आहे. निरा नदी तुडुंब भरून वाहत आहे; मात्र पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत अद्यापपर्यंत मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

अर्धा पावसाळा संपला तरीही पुरेशा पावसाअभावी पुरंदर तालुक्याचा दक्षिण-पूर्व भाग अजूनही कोरडाठाक पाहायला मिळत आहे. अनेक गावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यांची टंचाई असल्याने येथे ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जुलै महिन्यांच्या सुरुवातीला अल्प पावसाच्या जोरावर पेरण्या केलेल्या खरिपाची पिके, त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसामुळे अद्यापपर्यंत कशीबशी तग धरून आहेत. सध्या पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नाची शाश्वती नाही. शेतकऱ्यांचा पिकांवर मशागतीपासून खुरपणी, खतपाणी, फवारणीचा खर्च सुरूच आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांपुढील अनेक अडचणी वाढतच असल्याचे पाहायला मिळते.

पुरंदर तालुक्याचा दक्षिण-पूर्व भाग हा दुष्काळी पट्ट्यात येत असून, येथील बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या भागातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी जुलै महिना संपत आला तरी देखील वाल्हे गावच्या पूर्वेकडील भागात अद्याप एकही मुसळधार पाऊस नाही. त्यामुळे परिसरातील ओढे-नाले, तलाव, बंधारे अजूनही कोरडेठाक आहेत.

भूजलपातळी आणि उसासाठी मुसळधार पावसाची गरज

धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असली, तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जून आणि जुलै हे पावसाळ्यातील दोन महिने उलटूनही या भागात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जमिनीतील ओलावा आणि भूजलपातळी अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही.

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश शेती निरा डावा आणि खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असली, तरी तालुक्याच्या पश्चिम भागात अद्याप मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. अधूनमधून होत असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळत असला, तरी शेतजमिनींना आवश्यक ओलावा मिळालेला नाही.

या भागात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या उसाच्या पिकासाठी वापसा परिस्थिती असली, तरी सऱ्यांमध्ये पाणी साचेल इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाच्या वाढीसह विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत.

सततच्या हलक्या पावसामुळे उसाच्या पिकांना काही प्रमाणात फायदा झाला असला, तरी तणांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तणनाशकांची फवारणी करावी लागत असून, उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तसेच मुसळधार पाऊस झाल्यास हुमणी किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उसाचे संरक्षण, भूजलपातळी वाढ आणि आगामी शेती हंगाम लक्षात घेता शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

उत्पन्नाची शाश्वती नसली तरी, पिकांवर होणारा खर्च काही टळत नाही. सध्या पाऊस कमी असल्याने अद्यापपर्यंत वाल्हे परिसरातील बंधारे, ओढे-नाले अद्यापपर्यंत कोरडेठाक आहेत. त्यामुळे विहीर, कूपनलिकांची पाण्याची पातळी अद्यापपर्यंत वाढली नाही. यामुळे भविष्यात पिकांना पाणी द्यायला पाणीच उपलब्ध होणार नाही. खरीप हंगामातील पिकांसाठी तसेच ऊस व जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
- नारायण पवार, शेतकरी, सुकलवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT