पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनावरून निर्माण झालेला प्रश्न अजूनही कायम आहे. यासंदर्भात बाधित शेतकर्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील साखर संकुल येथे झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीही उपस्थित होते. (Pune Latest News)
या प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव मेमाणे आणि खानवडी या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. एकूण 13 हजार 300 खातेदारांपैकी 2 हजार 471 खातेदारांनी हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर जिल्हा प्रशासनाने जून महिन्यात सुनावणी घेतली होती. दरम्यान काही शेतकर्यांनी स्वेच्छेने जमिनी देण्याची तयारी असल्याचेही प्रशासनाला कळविले आहे.
शनिवारी झालेल्या बैठकीत साधारण 25 ते 30 शेतकरी पवारांना भेटले. त्यांनी सरकारकडून देऊ केलेला मोबदला अपुरा असल्याचे सांगून त्यात वाढ करण्याची मागणी केली. तसेच केवळ आर्थिक मोबदला नव्हे, तर बाधित शेतकर्यांच्या पुनर्वसनाची हमी व स्पष्ट धोरण जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही शेतकर्यांनी केली. सरकारने एरोसिटीमध्ये डेव्हलप प्लॉट देण्याचा प्रस्ताव मांडला असला, तरी त्याबाबत शेतकर्यांमध्ये संभ—म आहे.
शरद पवार यांनी शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि साधारण तासभर त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी याबाबत लवकरच चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले, असे शेतकर्यांनी सांगितले.
पुरंदर विमानतळ प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आता शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने या प्रश्नात रस दाखविल्याने सरकारवर तोडगा काढण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.