पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपीच्या कृत्याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तानपुरे यांच्या पत्नी सोनाली तानपुरे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल आहे की, "या मुलांच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाला शाळा बदलावी लागली…"
पुण्यात रविवारी (दि.१९) पहाटे भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली, यात तरुण-तरुणी जागीच ठार झाले
संशयीत आरोपी अल्पवयीन; 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा
मुलाकडे वाहन परवाना नसताना वडिलांनी पोर्शे कार चालवायला दिली होती
संशयीत आरोपी आणि त्याच्या मित्रांनी सोनाली तानपुरे यांच्या मुलाला त्रास दिला होता
पुण्यात रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने कल्याणनगर येथे आपल्या अलिशान गाडीने दोघांना चिरडले. यात आयटी अभियंता असलेले तरुण व तरुणी जागीच ठार झाले. मृत दोघेही मध्य प्रदेशचे आहेत. दरम्यान या घटनेनंतर विविध स्तरातून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तानपुरे यांच्या पत्नी सोनाली तानपुरे यांनी आपल्या 'X' अकाउंट पोस्ट करत संशयित आरोपीबाबतीत एक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
"कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा."
अल्पवयीन आरोपीने पाेलिसांना सांगितले आहे की, मी दारु पीत असल्याचे वडिलांना माहित होते. त्यांनीच मला कार दिली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आलं आहे की, "आरोपीकडे वैध वाहन परवाना आणि कार चालवण्याचे वैध प्रशिक्षण नाही, हे माहित असूनही त्याच्या वडिलांना त्याला कार चालवायला दिली होती. त्याचबरोबर त्याला पार्टी करायला परवानगीही दिली होती. पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे अपघातातील अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया यांच्या कुटुंबीयांनी मुलांचे मृतदेह पाहताच आक्रोश केला. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकलुता एक मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते. या अपघाताने दोघांते नातेवाईक हादरले आहेत.
अनिशचे आजोबा आत्माराम अवधिया म्हणाले की, पुण्यातील प्रख्यात बिल्डरच्या मुलाला जामीन मिळायला नको होता. "या अपघातात दोन जणांचा जीव गेला, हे पूर्णपणे चुकीचे आहे. या अपघातातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असे आमचे मत आहे. त्यामुळे आरोपींना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा," अशी इच्छा मृत अनिश याच्या आजोबांनी व्यक्त केली. अनिसचे काका अखिलेश अवधिया म्हणाले, "अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि ताशी १६० किमी वेगाने गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे 'ही हत्या आहे, अपघात नाही."