पुणे: मे महिन्याच्या अखेरीस वाढलेल्या उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव झाले असून, तब्बल सव्वा लाखांहून अधिक नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यात 58 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
विशेषतः आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 28 टँकर सुरू असून, अनेक गावांतील विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. त्यानंतर जुन्नर आणि खेड तालुक्यातही पाण्यासाठी नागरिकांची धावपळ वाढली आहे.
दरम्यान, पावसाळा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असला तरी अनेक धरणे आणि स्थानिक जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण आणि दीर्घकालीन नियोजनाच्या अभावामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.