पुणे: पुणेकरांच्या करांचे 100 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या मुंढवा जॅकवेलमधून शेतीयोग्य शुद्धीकरण केलेले 50 टक्केही पाणी शेतीसाठी उचलण्यास असमर्थ ठरलेला जलसंपदा विभाग पुण्याचे पाणी कमी करण्याची भाषा करीत आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कारनाम्यामुळेच खडकवासला धरणातून सिंचनासाठी पाणी देण्यात येत असल्यामुळे पुणेकरांवर पिण्याच्या पाण्याची टांगती तलवार येण्याची वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे.
खडकवासला साखळी धरणामधून मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतीसिंचनासाठी जादा पाणी देण्यात येत आहे. त्यातच उन्हाळी आवर्तन जोरात सुरू आहे. परिणामी, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार उभी ठाकली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त दिले होते. यावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले की, पुणे महापालिका ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे, जी शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी दररोज 65 कोटी लिटर सांडपाणी शुद्ध करून बेबी कॅनॉलमधून दौंडपर्यंत शेतीसाठी सोडते.
यासाठी पुणेकरांच्या करांच्या पैशातून 100 कोटी रुपये खर्चून मुंढवा जॅकवेल यंत्रणा उभारली आहे. मात्र, डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या चार महिन्यांच्या आकडेवारीनुसार दररोज 65 कोटी लिटर (650 एमएलडी) ऐवजी सरासरी रोज फक्त 25 कोटी लिटर (250 एमएलडी) शुद्धीकरण केलेले सांडपाणी जलसंपदा विभाग उचलून पुढे शेतीसाठी सोडत असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, याच काळात खडकवासला धरणसाखळीतून शेतीसाठी पिण्याचे पाणी आवर्तन म्हणून सोडले जात आहे. जर मुंढवा जॅकवेलमधून पूर्णक्षमतेने हे शुद्धीकरण केलेले सांडपाणी शेतीसाठी मागील चार महिने उचलले असते (एकूण पावणेदोन टीएमसी), तर आज धरणातील किमान एक टीएमसी पाणी शेतीसाठी सोडावे लागले नसते, जे पुण्याची पिण्याच्या पाण्याची गरज भागवू शकले असते.
अपयश झाकण्यासाठी जलसंपदा विभागाची अरेरावी
आपले अपयश झाकण्यासाठी जलसंपदा विभाग अरेरावी करून पुण्याचे पिण्याचे पाणी कमी करण्याची भाषा करीत आहे. ही बाब खेदजनक असून, तातडीने पुण्याचे पालकमंत्री तसेच सर्व आमदार यांच्यापुढे जलसंपदा विभागाचे कारनामे ठेवून पुण्याची पाणीकपात टाळण्यासाठी खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले.