पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराचा सरासरी पारा गुरुवारी 40 अंशांवर गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले. बागेसह थंड हवेच्या जागा शोधत अनेकांनी उकाड्यापासून सुटका करून घेतली. तर सरबत, शीतपेयांच्या दुकानांवर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
गुरुवारची सकाळ उजाडली ती ढगाळ वातावरणाने. सकाळी 11 पर्यंत शहरात ढगाळ वातावरणासह वारे सुटल्याने तापमानापासून किंचितसा दिलासा मिळाला. मात्र, दुपारी 12 नंतर ऊन चांगलेच तापले. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेले दिसले. शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पर्वती, पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराच्या दाट झाडी असलेल्या परिसरात आबालवृध्द आराम करताना दिसत होते. पाताळेश्वर मंदिरात तर विद्यार्थी अभ्यासासाठी जमले होते.
शहरात सरबत, शीतपेयांच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी दिसली. लिंबू पाणी, कोकम, कैरीचे ताजे पन्हे यासह विविध प्रकारचे सरबत घेत सर्व वयोगटातील नागरिक उन्हाने तीव्र होणारी तहान शमवत होते. उकाड्याने हैराण झालेला प्रत्येक जण सरबताच्या स्टॉलवर येत होता. नारायण पेठ, गुरुवार पेठ, लक्ष्मी रस्ता या परिसरात सरबतांच्या गाड्यांवर गर्दी दिसली.
हेही वाचा