पुणे, पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली 'पनवेल-नांदेड एक्सप्रेस' मध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी (दि.५) सायंकाळी तब्बल एक तास पुणे स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना मोठा उशीर झाला असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या सातत्याने अनेक तक्रारी येत असतात. अशीच तक्रार शनिवारी सायंकाळी पनवेल नांदेड एक्सप्रेस बाबत आली. गाडीतील झुरळांच्या समस्येला वैतागून प्रवाशांनी रेल्वे प्रवाशांनी गाडीलाच रोखून धरली.
पनवेल-नांदेड एक्सप्रेस मधील वातानुकूलित डब्या (डी 1 – 182319) मध्ये प्रवाशांना झुरळांचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुंबईहून सुटलेली ही गाडी प्रवाशांनी पुणे स्थानकावर आल्यानंतर रोखून धरली आणि याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. जोपर्यंत गाडीची स्वच्छता होत नाही तोपर्यंत आम्ही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा जोर प्रवाशांनी लावला होता, त्यामुळे गाडी पुणे रेल्वे स्थानकावर तब्बल एक तास थांबली होती.
सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर आली. यावेळी प्रवाशांनी वैतागून हे पाऊल उचलले. याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाने या डब्यामध्ये जाऊन प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवासी ऐकत नव्हते. अखेर प्रवाशांनी रेल्वे कडे याबाबत लेखी मागितली. लेखी दिल्यानंतर आठ ते सव्वा आठच्या सुमारास ही गाडी नांदेडच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने या डब्यामध्ये एक स्वच्छता कर्मचारी, एक इंजिनियर पाठवून दिले आणि नांदेड स्थानकावर हा डब्बा रिप्लेस करण्यासंदर्भात किंवा पेस्ट कंट्रोल करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु झुरळामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला यावेळी चांगला धडा शिकवला.