जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे उष्माघातामुळे रूपाली गाडगे या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. 
पुणे

Pune News : उन्हाचा तडाखा ठरला जीवघेणा! जुन्नरमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात काम टाळावे, अशीही सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे उष्माघातामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) सकाळी घडली. रूपाली भाऊ गाडगे (वय 40) असे या महिलेचे नाव आहे.

रूपाली गाडगे ह्या गेल्या दोन दिवसांपासून कडक उन्हात शेतात खुरपणीचे काम करीत होत्या. सोमवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने निमगाव सावा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष रास्ते यांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले.

तपासणीदरम्यान त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अधिक तपासण्यांची गरज असल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी डायग्नोस्टिक केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तपासणीसाठी जाताना वाहनात बसताना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

रूपाली गाडगे यांच्या पश्चात पती व तीन मुले असा परिवार आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात काम टाळावे, अशीही सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.

याबाबत जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, संबंधित महिला शेतात काम करीत असताना चक्कर येऊन पडली. मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT