मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे (ता.आंबेगाव) येथे रविवारी( दि.२२) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात पिंपरी येथील एकाच कुटुंबातील पती,पत्नी आणि सासू अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे (रा.पिंपरी, पुणे) हे आपल्या कुटुंबासह नाशिकहून पुण्याकडे कार (एमएच १४ डीटी १७७०) ने येत होते.एकलहरे गावाजवळ कारचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला (एमएच १८ बीझेड ४०६७) धडकली.या भीषण धडकेत चालक मल्लिकार्जुन आंबेगावे(वय ४६),त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४२) आणि सासू लता बाळू भूपलोंढे (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मुलगा प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे (वय २०) आणि मुलगी मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे (वय १६) ही दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याचेही समोर आले आहे.बसच्या पुढील बाजूचे भागाचे नुकसान झाले आहे.अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघात कश्यामुळे झाला याचा पुढील तपास सुरू आहे.मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.