पुणे: बंगालच्या उपसागरातून गुजरातकडे सरकत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या काही भागांत पावसाने चांगालाच धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (दि. ३१) देखील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
त्यात पुणे व नाशिक घाट परिसरात अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली, यात जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या पूर्व भागापेक्षा घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.