प्रसाद जगताप
पुणे : पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या तसेच त्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे पुणे-मिरज-कोल्हापूर या भागातील रेल्वे प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे तसेच मालवाहतुकीला गती
प्राप्त होईल. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरणाचे काम 2017 मध्ये हाती घेण्यात आले. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. या कामासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला आहे.
तसेच, येत्या जून 2024 पर्यंत ही कामे पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासन सांगत आहे. दरम्यान, या कामांना उशीर का लागला? याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या भागात डोंगराळ प्रदेश असल्याने दुहेरीकरणाचे काम सध्या संथ गतीने सुरू आहे. भूसंपादनाच्या कामामुळे मध्यंतरीच्या काळात हे काम काही काळ रखडले होते. आता ते सुरू करण्यात आले असून, रेल्वे प्रवाशांना 2024 मध्ये या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.
मागील महिन्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्यासह पुणे रेल्वे विभागाच्या अधिकार्यांनी पुणे-मिरज दुहेरीकरणाच्या कामाची नुकतीच पाहणी केली आहे. त्यामुळे आता या कामांचा वेग लवकरच वाढणार असल्याचे दिसत आहे.
पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमच्याकडील बांधकाम विभागाकडून हे काम सुरू आहे. 2017 मध्ये या कामाला सुरुवात झाली असून, 155 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. तर, 125 किमीचे बाकी असलेले काम जून 2024 पर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत.
– अजय कुमार, जनसंपर्क अधिकारी,
रेल्वे, पुणे विभाग