पुणे : गेल्या काही दिवसांपासून आरटीओकडून ई-वाहनचालकांना टॅक्स भरण्याबाबत येत असलेल्या मेसेजेसमुळे वाहनधारकांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आता लेखी पत्रक काढून हे मेसेजेस तांत्रिक चुकीमुळे गेले असल्याचे स्पष्ट करत, ई-वाहनधारकांनी टॅक्स भरू नका, असे सांगितले आहे. तसेच इंधनावरील ज्या वाहनधारकांना हा मेसेज आला आहे, अशांनी तातडीने आपल्या वाहनावरील टॅक्स भरावा, असे आवाहनही आरटीओकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या इलेक्ट्रीक वाहन धोरण 2025 नुसार, राज्यातील सर्व इलेक्ट्रीक वाहनांना 31 मार्च 2030 पर्यंत मोटार वाहन करातून (रोड टॅक्स) 100 टक्के सूट देण्यात आली आहे. असे असतानाही परिवहन विभागाच्या सिस्टिममधून अनेक ई-वाहन मालकांना थकीत कर भरण्याबाबत एसएमएसद्वारे नोटिसा गेल्या होत्या. यामुळे आपली करमाफी रद्द झाली की काय? अशा संभ्रमात ई-वाहनधारक पडले होते. या वाढत्या तक्रारींची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अधिकृत पत्रक जाहीर केले आहे.
त्यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांना मिळालेली करमाफी अजूनही लागू आहे. ज्या ई-वाहन धारकांना टॅक्स भरण्याबाबत एसएमएस मिळाले आहेत, त्यांनी त्या नोटिसा रद्द समजाव्यात, असे स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कर भरू नये, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले.
इलेक्ट्रीक वाहन धोरणानुसार ई-वाहनांची करमाफी कायम आहे. तांत्रिक कारणास्तव गेलेल्या नोटिसा नागरिकांनी ग्राह्य धरू नयेत, त्या रद्द समजाव्यात. ही सवलत केवळ इलेक्ट्रीक वाहनांसाठीच आहे. इंधनावर चालणाऱ्या ज्या वाहनधारकांचा कर थकीत आहे, त्यांनी मात्र आपला कर वेळेत भरणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे