पुणे: खडकवासला धरणातून शुक्रवारी (दि. ३१ जुलै) केलेल्या ४३ हजार क्युसेक विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसराला पुराचा मोठा फटका बसला होता. येथील ९ ते १० सोसायट्यांमध्ये कमरेएवढे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. मात्र, शनिवारी (दि.१) पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर पूर ओसरला असून, एकतानगरातील जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे.
दै. 'पुढारी'ने शनिवारी या भागाची पाहणी केली असता, पूर ओसरल्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे हाल होऊ नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले होते.
दूषित पाण्यामुळे आरोग्य बिघडू नये, यासाठी महापालिकेने प्रभावित परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स उपलब्ध करून दिल्याचे दिसले. पुराच्या पाण्यानंतर पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या तातडीच्या वैद्यकीय तपासणीसाठी 'फिरता दवाखाना' तैनात केला होता.
ज्या सोसायट्यांच्या तळघरात आणि घरात पाणी शिरले होते, येथील अंडरग्राउंड पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची महापालिकेकडून विशेष स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय अनेक नागरिक आणि स्थानिक दुकानदार आपल्या घरांमध्ये, दुकानात शिरलेले पाणी आणि खराब झालेल्या वस्तू, कचरा बाहेर काढताना दिसून आले.
आम्ही सकाळपासून पूर ओसरलेल्या परिसराची स्वच्छता केली आहे. रोगराई पसरू नये म्हणून परिसरात औषध फवारणी आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी (फॉगिंग) करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.सूर्यभान शिर्के, आरोग्य निरीक्षक, महापालिका.