शिरूर : रांजणगाव परिसरात सोमवारी (दि. २) दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक झालेल्या कंपनामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले होते.
या धक्क्यांमुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. घरातील भांडी पडली असल्याचे स्थानिक व्यावसायिक ओमकार शेळके यांनी सांगितले, तर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचे सोसायटीचे संचालक सुनील खेडकर यांनी सांगितले. शंकर सिंग ठाकूर यांच्या घराला या धक्क्यामुळे तडे गेले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, भूकंपाची तीव्रता व केंद्रबिंदू याबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. या बाबत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.