राजगुरुनगर: राजगुरुनगर शहरातील स्मशानभूमीत रविवारी (दि २८) एका अघोरी प्रकारची घटना समोर आली आहे. मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी एक जनावर मारून त्याची पूजा करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
परिसरात वावर असलेल्या नागरिकांच्या सांगण्यानुसार शनिवारी (दि २७) रात्री उशिरा किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. स्मशानभूमीतील प्रेत जाळण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. एका जाळीवर जनावराचा बळी देण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी हळदी-कुंकू लावून आणि अगरबत्त्या लावून विधीवत पूजा करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचे थारोळे, जनावराचे मांस व अवशेष, हळदी-कुंकूचे खुण, अगरबत्त्यांच्या राख आणि पूजेची इतर साहित्ये आढळून आले आहे.
या घटनेला अघोरी विधीशी जोडले जात आहे. अघोरी प्रकारात काही काळी जादू किंवा तांत्रिक विधींमध्ये जनावरांचा बळी देण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात असे प्रकार निषिद्ध मानले जातात. घटनेच्या पाठीमागे कोणता हेतू असावा याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. काहीजण याला काळ्या जादूचा प्रयत्न म्हणत आहेत, तर काहींना यामागे व्यक्तिगत वैमनस्य किंवा इतर काही कारणे असू शकतात, असे मत व्यक्त करत आहेत.राजगुरुनगर आणि आसपासच्या २४ गावे, वाड्या वस्त्या या ठिकाणी अंत्यविधी करतात. सर्व गावांमध्ये या बातमीने खळबळ उडाली आहे.