'हंगाम संपताच अंतिम एफआरपीचा फरक द्या' file photo
पुणे

'हंगाम संपताच अंतिम एफआरपीचा फरक द्या'

साखर आयुक्त दीपक तावरे यांच्या कारखान्यांना महत्त्वपूर्ण सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम संपल्यानंतर त्यांनी 15 दिवसांच्या आत त्याच हंगामाच्या अंतिम साखर उतार्‍यानुसार अंतिम एफआरपी निश्चित करावी, त्याप्रमाणे फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व प्रादेशिक साखर सह संचालक, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 व कारखान्यांचे कार्यकारी संचालक व सरव्यवस्थापकांना पत्रांन्वये नुकत्याच दिल्या आहेत.

राज्यातील गाळप हंगाम 2024-25 मध्ये हंगाम संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत कारखान्यांनी त्या हंगामातील साखर उत्पादनानुसार आलेला प्रत्यक्ष साखर उतारा व इथेनॉल निर्मतिीसाठी उसाचा रस, सिरप व बी हेवी मोलॅसिसच्या वापरामुळे, विक्रीमुळे साखर उतार्‍यात आलेली घट एकत्रित करून अंतिम साखर उतारा निश्चित करण्यात यावा.

तसेच, त्याप्रमाणे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा अंतिम एफआरपीची रक्कम देण्यात यावी. इथेनॉल निर्मतिीसाठी उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसिसचा वापर केल्यामुळे आलेल्या साखर उतार्‍यातील घट केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या सक्षम संस्थांकडून प्रमाणित करून घेण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

कारखान्यांनी या हंगामातील एफआरपी ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना 100 टक्के अदा केल्याबाबत एफआरपी निरंक दाखला मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित प्रादेशिक साखर सह संचालकांमार्फत साखर आयुक्तालयास सादर करावा.

हंगाम 2024- 25 मधील एफआरपी निरंक दाखला या कार्यालयातून मिळाल्यानंतरच साखर कारखान्यांना हंगाम 2025-26 करिता गाळप परवाना देण्यात येईल. तसेच, एफआरपीची कार्यवाही करत असताना प्रचलित कायदा, नियम आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व साखर कारखान्यांनी दक्षता घ्यावी आणि अधिनियमातील तरतुदीप्रमाणे दिलेल्या मुदतीमध्ये अंतिम ऊस दर देण्यास विलंब होणार नाही, याची प्राधान्याने नोंद घ्यावी.

आत्तापर्यंत 64 साखर कारखान्यांची धुराडी बंद

राज्यात यंदाचा हंगाम 2024- 25 मध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी मिळून 200 साखर कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत एकूण 64 कारखान्यांची धुराडी ऊस संपल्याने बंद झालेली आहेत. त्यामध्ये सोलापूर विभागातील (सोलापूर- धाराशिव) 45 पैकी 38 कारखान्यांचा हंगाम बंद झाल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

अतिरिक्त पदभार तावरे यांच्याकडे

मावळते साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीनंतर साखर आयुक्तपदी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्या नियुक्तीचे आदेश 18 फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी जारी केले. मात्र, अद्यापही सालिमठ हे रुजू झाले नाहीत. तोपर्यंत साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT