पुणे; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाचे प्रशासनाकडून कागदोपत्री नियोजन पूर्ण झाले असले, तरी पाऊस लांबल्यास शेतकर्यांनी काय करावे, याबाबत अद्याप प्रशासन दरबारी प्रत्यक्षात कुठल्याच हालचाली नाहीत. मात्र, तज्ज्ञांकडून पाऊस लांबल्यास खरिपातील बहुतांश पिकांना फटका बसू शकेल. तसेच उत्पादकतेवर याचा मोठा परिणाम होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना खरिपामध्ये भात, सोयाबिनसह अन्य पिकांमधून भरघोस उत्पादन मिळते. खरिपातील पिकांच्या भरवशावर वर्षभराचे शेतकर्यांचे नियोजन ठरलेले असते. परंतु, खरिपासाठी आवश्यक असलेला पाऊसच लांबला, तर मात्र, परिस्थिती बिकट होते.
त्यामुळे सर्व शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. हवामान विभागाने या वर्षी साधारण स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, गुरुवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे वृत्त आले, परंतु तो मान्सून अनुमानित वेळेत महाराष्ट्रात पोहोचला नाही तर त्याचा फटका पिकांना बसू शकतो. परंतु, याबाबत शासनस्तरावरून पाऊस लांबल्यास काय करावे, याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. केवळ दरवर्षीप्रमाणे खरिपाचे कागदोपत्री नियोजन करून मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका पार पडल्या आहेत.
पाऊस लांबल्यास भात लागवडीला विलंब होणार आहे, यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच सोयाबीन, बाजरी, मूग आणि उडदाच्या पेरण्यादेखील लांबणार आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आणि कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक सदस्य, डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 95 टक्के पावसाचा अंदाज आहे.
यामध्ये पूर्व विदर्भ व मध्य विदर्भ विभागात शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, उर्वरित अनेक भागात पावसाचा खंड पडेल. जून महिन्यात कमी पाऊस आहे. त्यामुळे खरिपात शेतकर्यांनी 65 मिलिमीटर पाऊस व पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. याशिवाय धूळवाफ पेरणी करू नये. फळबाग उत्पादकांनी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
पाऊस लांबल्यास सोयाबिनसह इतर पिकांना फटका बसू शकतो. भातलागवडीसाठी आवश्यक असलेल्या बियाणे खरेदीला सध्या उठाव कमी आहे. जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात खतांचा साठा आहे. युरिया, डीएपीचा सुरक्षित साठा प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेला आहे.
अशोक पवार,
जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि. प.
हेही वाचा