पुणे: जीबीएससारख्या रोगाच्या उद्रेकातून संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्याच्या साथरोग नियंत्रण कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या बैठकीसाठी विधानभवन येथे आले असता ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी आबिटकर म्हणाले, वाढत्या नागरिकरणामुळे साथरोगासारखे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. यामुळे साथरोग नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार आहे. साथरोग नियंत्रण कायद्यात आगामी विधानसभा अधिवेशनात दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात येणार आहेत.
जीबीएस आजारावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळविले आहे. आरोग्य विभाग आणि महापालिका या सगळ्या यंत्रणांनी चांगच्या पद्धतीने समन्वयाने काम केले आहे. पुण्यात रुग्णांची संख्या प्रमाणात राखण्यात यशस्वी ठरलो आहोत. जीबीएसमुळे एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णाला पूर्वीचे असणारे आजार आणि रोगप्रतिकार शक्तीच्या अडचणी यामुळे हे मृत्यू झाले आहेत. राज्यात प्रत्येक महिन्यात एका हॉस्पिटलमध्ये 5 ते 6 जीबीएस रुग्ण सापडतात. अशाच प्रकारची स्थिती देशभरात आहे. हे प्रमाण एकदम वाढल्याने सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, मात्र आता नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
जीबीएस संदर्भात काही पथके नेमण्यात आली होती. त्यांनी खडकवासला धरणाच्या वरच्या बाजूला असणार्या हॉटेलमधील सांडपाणी, कुक्कुटपालन केंद्रामुळे प्रदूषण निर्माण झाले का याची तपासणी केली. तसेच दिल्लीचे पथकसुद्धा आले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे काम करता येईल. महापालिकेच्या वतीने टँकरच्या पाण्यात क्लोरिनेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.