पेठ (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार भागात अनेक शेतकर्यांनी बटाटा पीक घेतले आहे. जोमदार वातावरण असल्याने बटाटा पीक जोमात आले आहे. भावडी, थुगाव व कारेगाव आदी गावांत शेतकर्यांनी बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. सध्या हे पीक दीड महिन्याचे झाले आहे. एक एकर शेतीत प्रति पन्नास किलो बियाण्यांचा एक कट्टा, असे बारा कट्टे लागत आहेत. साडेतीन हजार रुपये प्रति शंभर किलो बियाण्यांसाठी लागत आहे. एक हजार सातशे रुपये एका पन्नास किलो बॅगला लागत आहेत.
एकरी खर्च बियाणे, मजुरी, खते, औषधे, फवारणी आदीसाठी 40 ते 45 हजार रुपये लागत असल्याचे शेतकरी गोरक्षनाथ नवले पाटील यांनी सांगितले. सध्या जरी ढगाळ वातावरण असले तरी बटाटा पीक जोमात आहे. मातीत बटाटे फुगण्याचा कालावधी असल्याने शेतकरी पिकाची विशेष काळजी घेत आहे. खुरपणी व खतांचा भरपूर वापर करून पीक जोमात आल्याने शेतकरी समाधानी आहे. बाजारभाव जास्त मिळाला तर शेतकर्यांना खर्च केल्याप्रमाणे चांगले उत्पन्न मिळेल, असे मत गोरक्षनाथ नवले पाटील व भावडी सोसायटीचे अध्यक्ष सोपानराव नवले पाटील यांनी व्यक्त केले.