पुणे

पुण्यात भरदुपारी वाहनांची वामकुक्षी; प्रदूषण निम्म्याने घटले

अमृता चौगुले

आशिष देशमुख

पुणे : शहरात दुपारी तापमानाचा पारा टिपेला जात असल्याने असह्य उकाड्याला कंटाळून नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. रस्त्यावर वाहनांची गर्दीच कमी झाल्याने दुपारी शहराच्या प्रदूषणात चक्क 50 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसत आहे. 'सफर' या संस्थेच्या नोंदीत
ही माहिती समोर आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा जाणवत असल्याने दुपारी 1 ते 3 या वेळेत रस्त्यांवरची वाहतूक 70 ते 80 टक्क्यांनी कमी झाली आहे.

नागरिकांनी उन्हात पडणे जवळ-जवळ बंद केले आहे. मालवाहतूक वगळता किरकोळ कामासाठी शहरातील नागरिक दुपारी 1 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. वैयक्तिक दुचाकी, चारचाकी गाड्यांची वर्दळ थांबल्याने शहरातील हवाप्रदूषणात 50 टक्के घट झाल्याची नोंद 'सफर' या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सरकारी संस्थेने घेतली आहे.

धूलिकणांचे प्रमाण घटले…

शहरात आरटीओच्या नोंदीनुसार, सुमारे 41 लाख वाहनांची नोंद आहे. शिवाय, पिंपरी-चिंचवडची 25 लाख वाहने व शहराबाहेरून किमान 1 ते दीड लाख वाहने ये-जा करीत असतात, त्यामुळे शहरात धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत वाहनांची संख्या रोडावल्याने धूलिकण प्रदूषणात मोठी घट झाली आहे. यात सूक्ष्म धूलिकण 10, अतिसूक्ष्म धूलिकण 2.5, नायट्रोजन डाय-ऑक्साईड व ओझोनचे प्रमाण निम्म्याने घटले आहे.

सायंकाळ होताच पुन्हा होते वाढ

हवेची गुणवत्ता ही स्वयंचलित यंत्राने मोजली जात असल्याने ती दर सेकंदाची मोजली जाते. त्यामुळे दुपारी 1 ते 3 पर्यंतची हवा समाधानकारक गटात गणली जात आहे. मात्र, सायंकाळी 5 नंतर रहदारीला पुन्हा वेग येऊन ती सायंकाळी 7 वाजता अतिप्रदूषित गटात जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT