पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोबाईल हरविल्याच्या शेकडो घटनांची नोंद ऑनलाईनरित्या केली जाते. त्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाला तब्बल 21 मोबाईल परत मिळविण्यात यश आले आहे. हे मोबाईल राज्यातील विविध जिल्ह्यातून बीड, नाशिक, नांदेड तसेच पुण्यातून जप्त केले आहे. यामध्ये महागड्या मोबाईलचा समावेश ते संबंधीत तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी नोंद केल्या होत्या.
तक्रारींची दखल घेऊन हरवलेले मोबाईल फोन यांचा शोध घेण्याचे आदेश लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी सायबर पथकास दिले होते. त्या अनुषंगाने सायबर पथकाने हरविलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आयएमआए नंबरच्या आधारे राज्यातील विविध भागातून मोबाईल जप्त करण्यात आले. त्यामध्ये विविध कंपन्याचे विविध 21 मोबाईल जप्त केले.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक मारूती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज गोरे, अमंलदार समीर पिलाणे, सागर पाटील, किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्यानंतर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याहस्ते मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले.