देहुगाव(पुणे) : देहू देवस्थानच्या पुढे रस्त्यावर लावलेली वाहने उचलून नेण्यास वाहतूक पोलिसांनी पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे देहूगावात दर्शनासाठी आलेल्या भविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देहूत येणारा वारकरी, भाविकभक्त आपल्या दुचाकीवर येतो. गार्डी पार्क करून मंदिरात दर्शनासाठी जातात. इकडे पोलिस त्यांचे वाहन व्हॅनमध्ये टाकून घेऊन जातात. त्यामुळे वारकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. मंदिराजवळ वाहन पार्किंग करण्यास मनाई आहे. नो एंट्रीचा एकच फलक तोही एकदम बारीक बसविण्यात आला आहे. तो सहजासहजी दिसून येत नाही.
मुख्य मंदिर ते चौदा टाळकरी कमानीदरम्यान असलेल्या दुतर्फा रस्त्याच्या बाजूला ठळक दिसतील असा नो एंट्रीचे फलक लावणे आवश्यक आहे. तरीही वाहतूक विभाग असा फलक न लावता वारकर्यांचे वाहन उचलण्यावर भर दिला जात आहे. यामुळे दंडाची मोठी रक्कम द्यावी लागत असल्यामुळे वारकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्य मंदिरासमोरील रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. ही कारवाई थांबविण्यासाठी दैनिक 'पुढारी'मध्ये 4 एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृताची दखल घेऊन निगडी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने ही कारवाई थांबविण्यात आली होती.
त्यानंतर दीड महिन्यानंतर ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आल्याने वारकरी, भाविक-भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत वाहनतळाची सोय होत नाही, तसेच नो एंट्रीचे फलक ठळकपणे लावले जात नाहीत, तोपर्यंत कुठल्याही वाहनांवर दंडात्मक करवाई करू नये, अशी मागणी देहूचे ग्रामस्थ आणि वारकर्यांनी केली आहे.
लवकरच यासंदर्भात पोलिस प्रशासन, देहू देवस्थान यांची सयुंक्त बैठक घेणार आहे. त्या बैठकीत वाहनतळ उभारणे तसेच काही ठिकाणी नो एंट्री करून त्या ठिकाणी फलक बसविण्यात येणार आहेत. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
– डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, देहूनगर पंचायत
देहुतील पार्किंगच्या समस्येबाबत देहूनगर पंचयतीचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या सहकार्याने नो एंट्रीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील.
– अमरनाथ वाघमोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग