राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेची पाणी पुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन भरवस्तीत फुटुन उंच कारंजे उडत राहिल्याने चौथ्या मजल्यावर दुकानात पाणी साठले. चारही मजल्यावरील दुकानांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. शहरातील वाडा रस्त्यालगत गुरुवारी दिनांक १८ रोजी सकाळी आठ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. कारंजे पाहायला नागरिक थांबून राहत असल्याने परिसरात गर्दी वाढून वाहतूक विस्कळीत झाली होती.
राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या वाडा रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि बंदिस्त गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्यालगत असलेल्या भागातुन नगरपरिषदेच्या पाण्याच्या मुख्य तसेच उपवाहिण्या पूर्वीच टाकलेल्या आहेत. काम होताना त्यातील अनेक पाइपलाइन तुटण्याचे प्रकार घडले आहेत. फुटलेल्या पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
गुरुवारी मात्र पाइपलाइन तुटल्याचे निदर्शनास न आल्याने मुख्य वाहिनी सुरू करण्यात आली. पूर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरू होताच महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर सांडभोर यांच्या इमारती लगत पाण्याचे उंच कारंजे उडताना पाहायला मिळाले. सुमारे एक तास हे फवारे उडत होते. या काळात चार मजली इमारतीतील दुकानांमध्ये पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले. याशिवाय लाखो लिटर पाणी वाया गेले.नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
ज्या ठिकाणी पाईप लाईन फुटुन दुकानांमध्ये पाणी गेले. त्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे रस्ता उंच झाला आहे. जोराचा पाऊस झाला की उंच रस्त्याला पाणी अडून येथील अनेक इमारती, दुकानांमध्ये तळमजल्यावर पाणी साठते. तळमजला नुकसानीचा ठरला असतानाच आता वरच्या मजल्यावरील दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.