हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी येथील पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने पडलेली आहेत. यातच काही टेम्पो, हातगाडी, बस अशी विविध वाहनेदेखील आहेत. यात अनेक वाहने गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली, बेवारस, अपघात झालेली आहेत. त्यामुळे जागतिक दर्जाच्या आयटीनगरीत पोलिस ठाण्याच्या आधुनिक इमारतीशेजारीच वाहनांचा खच दिसत आहे.
हिंजवडी येथील पोलिस ठाण्याच्या आवारात मागील बाजूस मोकळ्या पटांगणात ही वाहने लावण्यात आलेली आहेत. यातील बरीच वाहने मागील काही वर्षांपासून येथे असल्याने त्यांना गंज चढला आहे. त्यांचे पत्रे सडले आहेत. सीटकव्हर खराब झाले आहेत. तर, काही चारचाकी वाहनांची बॉडीदेखील खराब झाली असल्याने येथील वाहने शेवटचा श्वास घेत आहेत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
आयटी पार्क हा अतिशय संवेदनशील भाग आहे. तसेच, येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ अनेक अपघातदेखील होत असतात. योग्य वेळी या वाहनांची विल्हेवाट लावली जात नसल्याने येथे अशा प्रकारे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे येथे या वाहनांमुळे वेगळे चित्र निर्माण झाले आहे. तसेच, या परिसरात अनेक काळ वाहने उभी असल्याने डासांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे येथे काम करणारे पोलिस कर्मचारी आणि कामानिमित्त येणार्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा