पाटस: पाटस (ता. दौंड) येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी, दगडफेक आणि हवेत चार वेळा गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. ५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी असलेल्या गरदडे कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यांवर रक्ताचे थेंब आढळून आल्याने घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील काही तरुण पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स परिसरात आले होते. यावेळी त्यांचा पाटसमधील काही तरुणांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दगडफेकीचीही घटना घडली. दगडफेकीत एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून त्यामधून काही तरुण फरार झाले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
दरम्यान, दगडफेक झाल्यावर वाद अधिक चिघळल्यानंतर हवेत चार वेळा गोळीबार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. गोळीबार झाल्यानंतर संबंधित तरुण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी तत्काळ हालचाली करत काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरात जमलेल्या नागरिकांची गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
या दोन गटांमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, तसेच गोळीबारामागील कारण काय होते, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.