खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील वर्दळीच्या धायरी फाट्यावरील स्व. रमेश वांजळे उड्डाणपुलाखाली अनेक वर्षांपासून सुरू असलेले दुचाकी वाहनांचे पार्किंग महापालिकेने बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच रस्त्यावरच वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. पूर्र्वीप्रमाणे पार्किंग सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजप, मनसेसह नागरिकांनी दिला आहे.
उड्डाणपुलाखाली रस्ता अरुंद आहे. फेरीवाले, भाजी विक्रेत्यांसह दुकानदारांच्या अतिक्रमणांचा या रस्त्याला विळखा पडला आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावर रिक्षांसह दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यासह धायरी परिसरातील वाहतूक कोलमडली आहे. याबाबत भाजप ओबीसी आघाडीचे शहर सरचिटणीस अतुल चाकणकर व नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चाकणकर म्हणाले, 'पार्किंग बंद केल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे बस, रिक्षा, अवजड वाहने, तसेच पदचार्यांना अडथळा होत आहे.' खडकवासला मनसेचे अध्यक्ष विजय मते म्हणाले, 'नागरिकांची गैरसोय होत असल्याने पार्किंग पुन्हा सुरू करावे; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव— आंदोलन करण्यात येईल.'
पार्किंग पुन्हा सुरू करण्याची मागणी
उड्डाणपुलाच्या परिसरात सहकारी, तसेच राष्ट्रीयीकृत बँका, शाळा, शैक्षणिक संस्था, खासगी क्लासेस आहेत. या ठिकाणी असलेले पार्किंग बंद केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. जुन्या इमारती असल्याने बहुतांश ठिकाणी पार्किंगची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना या पार्किंगचा आधार होता. यामुळे हे पार्किंग पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे
या पार्किंगमध्ये बेवारस वाहनांची संख्या वाढली होती. दोन, तीन आठवडे दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. हे पार्किंग विनामूल्य असल्याने वाहने उभी कून वाहनमालक अनेक दिवस गायब होत आहेत. दररोज वाहने उभी करणार्या नागरिकांची गैरसोय होत होती. बेवारस वाहनांमुळे घातपाती कृत्ये, दुर्घटना घडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविल्याने हे पार्किंग बंद केले आहे.
-संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय