खडकवासला: पानशेत, वरसगाव धरण परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खडकवासला धरणानंतर आता पानशेत व वरसगाव धरणांतूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दिवसभरात वरसगाव येथे 21 मि. मी., पानशेत येथे 20, तर टेमघर येथे 3 मि. मी. पाऊस झाला. काल सायंकाळी 5 वाजता खडकवासला धरणसाखळीत 29.08 टीएमसी म्हणजेच 99.79 टक्के पाणीसाठा नोंदविला गेला.
खडकवासला धरणातून मुठा नदीत 1 हजार 698 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पानशेत व वरसगाव धरणांतून प्रत्येकी 600 क्युसेक पाणी वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून सोडले जात आहे. (Latest Pune News)
खडकवासला परिसरात तुरळक पावसाचा अपवाद वगळता हवामान उघडे झाले आहे, तर टेमघर परिसरात रिमझिम सुरूच आहे. घाटमाथ्यावर सकाळी उघडीप होती, मात्र दुपारी पानशेत खोऱ्यात रिमझिमीनंतर दमदार सरी कोसळल्या.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले की, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस नसला तरी रिमझिमीमुळे ओढे-नाले पुन्हा वाहू लागले आहेत. सर्व धरणे भरल्यामुळे जादा पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
रविवारचा पाणीसाठा
29.08 टीएमसी (99.79 टक्के)