पुणे: माझे वडील माझ्या कुटुंबाचे आधार होते. ते एकमेव कमवते होते. आज मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून आले असून, हा प्रसंग मला विसरणं खूप अवघड आहे. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांना त्यांनी गोळ्या मारल्या. हे माणस नसून राक्षस आहेत. चार ते पाच दहशतवादी डोंगररांगातील जंगलातून अचानक आले.
त्यांनी एका- एकाला ठार मारण्यास सुरुवात केली. चारही बाजूला मृतदेह पडले होते. मृत्यूचे हे तांडव तब्बल 15 ते 20 मिनिटे सुरू होते. या नराधम दहशतवाद्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेने केली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहायला गेलेले हे दोन्ही कुटुंबीय धक्क्यात आहेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्यावर सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिने माध्यमांशी संवाद साधत मागणी केली.
आसावरी जगदाळे म्हणाली, आम्ही जवळपास 30 मिनिटे चढून पहलगामच्या त्या उंच डोंगरावर पोहोचलो. ही जागा खूप सुंदर आहे. आम्ही फोटो काढण्यात मग्न असताना डोंगरातील झाडीमधून अचानक चार ते पाच जण आले. त्यांच्याकडे बंदुका होत्या. त्यांनी गोळीबार सुरू केला. यामुळे लोक घाबरून पळू लागले.
आम्हीदेखील टेंटमध्ये लपलो. गनबोटे काका हे खाली लपले होते. दहशतवाद्यांपैकी एक जण गोळीबार करत आमच्याकडे आला. त्याने लपलेल्या काही जणांना पकडून गोळ्या मारायला सुरुवात केली.
माझ्या वडिलांना माझ्या डोळ्यादेखत त्यांनी तीन गोळ्या मारल्या. तर गनबोटे काकांनादेखील दोन गोळ्या लागल्या. त्यांनी फक्त पुरुषांना निवडून मारले. त्यानंतर आम्ही तिथून पळून आलो. आम्हाला स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली. मी चक्कर येऊन पडले होते.
थोड्या वेळाने लष्कर तेथे पोहोचले. जखमी लोकांना श्रीनगरमध्ये दाखल केले. रात्री 12 वाजता मला बाबांचा व काकांचा मृत्यू झाल्याचे कळले. त्यांनी आम्हाला ओळख पटवण्यासाठी नेले. त्यामुळे मारेकर्यांना कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका, अशी मागणी आसावरीने केली.
कलमा वाचून दाखवा... नाही तर...
आसावरी म्हणाली, दहशतवादी सर्वांना कलमा वाचून दाखवा, अस म्हणत होते. ज्यांना कलमा आला नाही त्यांना त्यांनी ठार मारलं. माझे वडील म्हणत होते तुम्हाला जे हवंय ते करतो पण आम्हाला सोडा. मात्र, त्यांनी काही ऐकले नाही. त्यांना त्यांनी गोळ्या मारल्या. दहशतवादी म्हणाले, आम्ही लहान मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही.