राहुल हातोले :
पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. मात्र, परिचारिकांअभावी येथील बालरोग अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) बंद आहे. त्यामुळे या विभागातील लाखोंचे साहित्य धूळखात पडून आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल आजारी बालकांवर सध्या साधारण वॉर्डमध्ये उपचार केले जात आहेत. अतिदक्षता विभाग बंद असल्याने सध्या येथील रुग्णालयात एकाच बेडवर दोन बालकांवर उपचार सुरू आहेत. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणार्या महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची ही स्थिती आहे; आपल्या बालकांवर अतिदक्षता विभागात उपचारांची गरज असूनही त्यांच्यावर साधारण विभागात उपचार करण्यात येत असल्याने बालकांचे नातेवाईकही हतबल झाले आहेत.
माझ्या बहिणीची प्रसूती झाल्यानंतर काही महिन्यांतच डॉक्टरांनी बाळाच्या शरीरात पांढर्या पेशींची कमतरता असून, वजनही कमी असल्याचे सांगितले. म्हणून डॉक्टरांनी मुलाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा सल्ला दिला. खासगी रुग्णालयात दिवसाला 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. म्हणून आम्ही मुलाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद असल्याचे कळाले. त्यामुळे सामान्य वर्गातच मुलावर उपचार सुरू असून, एकाच खाटेवर दोन बालकांवर उपचार सुरू आहेत. शेजारच्या बाळाचे इन्फेक्शन माझ्या मुलाला होऊ नये, अशी भीती वाटत आहे.
– जया पाटील, थेरगाव. (नाव बदलले आहे.)
अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येणारे रुग्ण साधारण वार्डात दाखल केली जात असल्याने साधारण वॉर्डातील डॉक्टर आणि परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
महापालिकेच्या वतीने परिचारिका पदांसाठी भरती केली जाणार होती; मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही भरती रखडली आहे. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर पदे भरण्यात यावी, यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी.
माझ्या मुलाला न्यूमोनिया झाला आहे. त्याला श्वसनाचा आणि थंडी- तापाचाही त्रास होत आहे. डॉक्टरांनी मुलाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यासाठी ससूनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मात्र, ससूनमध्ये बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही वायसीएममधून मुलाला हलवले नाही. मात्र, एकाच बेडवर दोन बालकांवर उपचार सुरू आहेत. आता तर माझ्या मुलाला ऑक्सिजनही लावला आहे. त्यामुळे मुलाच्या हालचालीमुळे शेजारच्या मुलालाही त्रास होत आहे. इथला पीआयसीयू सुरू असता तर मुलाची तब्येत लवकर बरी झाली असती.
– मानसी नाईक, चिंचवड.(नाव बदलले आहे.)
बालरोग अतिदक्षता विभागाची गरज
डेंग्यू, अस्थमा, न्यूमोनिया, हृदयासंबंधीत आजार आदी सारख्या आजारामुळे मुलांची तब्येत खालावते. अशावेळी या बालकांना अतीदक्षता विभागात दाखल करावे लागते. तब्येत खालावली असता सीपीआर देताना डॉक्टर आणि परिचारिकांना एकाग्र होऊन काम करावे लागते; मात्र सामान्य वॉर्डांत रुग्णांच्या नातेवाईकांची ये-जा सुरू असल्याने डॉक्टरांच्या कामात अडथळा येतात. परिणामी मुलांच्या जीवास धोका उद्भवू शकतो.
बंद बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) साहित्य
सहा अत्याधुनिक सुविधायुक्त बेड
व्हेंटिलेटर
सी-पीएपी
मल्टिमॉनिटर्स
चोवीस तास डॉक्टर्सची उपलब्धता