वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: भरणेवाडी येथील शेतकर्यांनी नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणास विरोध दर्शवला आहे. रविवारी (दि.30) येथील शेतकर्यांनी अस्तरीकरणाचे काम बंद पाडले आहे. नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत शेतकर्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. परिसरातील काही शेतकरी अस्तरीकरण व्हावे म्हणून आंदोलने करत आहेत, तर काही शेतकरी हे काम बंद पाडत आहेत. प्रामुख्याने या कामास शेतकरी संघटनेचा सुरवातीपासूनच विरोध आहे.
रविवारी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांच्या नेतृत्वात भरणेवाडी येथील शेतकर्यांनी काम बंद पाडले. कालव्याला अस्तरीकरण होण्याने कालव्यालगत असलेल्या शेतकर्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याने कालव्याची डागडुजी व खोलीकरण करावे, अस्तरीकरण नको, अशी मागणी शेतकर्यांनी केली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चवरे, जिल्हा परिषद आघाडीचे नेते युवराज म्हस्के, शेतकरी संघटनेचे मंगेश घाडगे, सचिन कोथमिरे, अमर बोराटे, बाबा पोरे, बाबा भरणे, अनिल पोरे, संतराम पोरे आदी उपस्थित होते.