ओतूर: खामुंडी (ता. जुन्नर) ते बदगी (ता. अकोले) या रस्त्यालगत असलेली सताड उघडी व असुरक्षित विहीर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांसाठी गंभीर धोका बनली आहे. विहिरीभोवती काही प्रमाणात संरक्षक कठडे असले तरी वरच्या मोठ्या व्यासाच्या भागावर कोणतीही मजबूत जाळी बसवलेली नाही. तसेच रस्त्यालगतही सुरक्षित कठड्यांचा अभाव असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा धोका अधिक तीव होत असून, वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे नुकत्याच घडलेल्या विहिरीत वाहन कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या विहिरीचा धोका अधिक अधोरेखित झाला आहे.
धोकादायक विहिरीभोवती मजबूत संरक्षक कठडे उभारणे, वरून लोखंडी जाळी बसवणे, तसेच रस्त्यालगत सुरक्षा भिंत व इशारा फलक लावणे, अशा उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.