Pune News: ई-पॉस मशिनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बदल करण्यात येत आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात रेशनवरील धान्यवाटप रखडल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे शहरात अजूनही दुकानांमध्ये गहू पोचला नसल्याने धान्यवाटप सुरू झाले नसल्याचा आरोप दुकानदारांच्या संघटनेने केला आहे. मात्र, अन्नधान्य वितरण अधिकार्यांनी धान्यवाटप सुरू असल्याचा दावा केला आहे. सर्व्हर धीम्यागतीने काम करत असल्याने 10 टक्केच धान्यवाटप झाले आहे.
राज्यात रेशनवरील धान्यवाटप ई-पॉस मशिनद्वारे केले जाते. या मशिनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बदल (सॉफ्टवेअर) काम सुरू आहे. त्यामुळे राज्यभरच ई पॉस मशिन संथगतीने काम करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. हीच स्थिती जिल्ह्यातही आहे. मात्र, शहरात वेगळी परिस्थिती आहे. शहरात काहीच दुकानांमध्ये तांदूळ पोचला आहे.
मात्र, गहू पोचला नसल्याने अन्नधान्य वितरण अधिकार्यांच्या कार्यालयातून वाटपासाठी आवश्यक असलेली परवानगी अद्याप मिळाली नसल्याचा आरोप रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अद्याप धान्यवाटप सुरू झाले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. महिन्याचे केवळ 12 दिवस उरले असताना धान्य केव्हा मिळणार आणि त्याचे वितरण केव्हा करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. धान्य दुकानांमध्ये पोचले असून, ई-पॉस मशिन सुरू आहे.
शहरात सुमारे 4 हजार टन तांदूळ वितरण व्यवस्थेतून दिला जातो. आतापर्यंत केवळ 2 हजार 200 टन तांदूळ पोहचला आहे. तर 2 हजार 600 टन गव्हापैकी 2 हजार 200 टन गहू दुकांनदारांपर्यंत पोहचला असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 800 दुकानांपैकी 1 हजार दुकानांमध्ये धान्य पोचले आहे.
तर ई-पॉस मशिनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी राज्यभरच असल्याने मशिन संथगतीने काम करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत 10 टक्के धान्यवाटप झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी सांगितले.
शहरात धान्यवाटप सोडा, धान्यच पोहचलेले नाही. वितरण केव्हा करणार, असा प्रश्न ग्राहक करत आहेत. अन्नधान्य वितरण अधिकारी धान्य पोचल्याचे खोटे सांगत आहेत.- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर